सोलापूर : कोरोनामुळे राज्यातील शाळांचे कुलूप यंदा उघडले नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याची घाई करु नये, असा अभिप्राय आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये निश्चित होणारे दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नाही. तर दहावी-बरावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेचाही निर्णय प्रलंबितच ठेवण्यात आला आहे.
"शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरु' या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, त्यावर बहुतांश विद्यार्थी व पालकांचे समाधान झालेले नाही. अनेकांना डोळ्याचा त्रास सुरु झाला असून मुलांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 21 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होतील, अशी चर्चा आहे. मात्र, राज्यातील सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परंतु, कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे कोरोनावरील लस आल्यानंतर तथा विद्यार्थ्यांच्या जिवाची शाश्वती मिळाल्यानंतरच शाळा सुरू होतील, असेही शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार ठरेल वेळापत्रक
दहावी-बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रकच निश्चित झालेले नाही. दुसरीकडे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचेही वेळापत्रक होऊ शकलेले नाही. सरकार आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन वेळापत्रक निश्चित केले जाईल.
- डॉ. अशोक भोसले, सचिव, पुणे बोर्ड
"त्या' 38 हजार विद्यार्थ्यांबाबत होईना निर्णय
गतवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर एटीकेटीअंतर्गत सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रोव्हिजनल प्रवेश मिळाला. मात्र, दोनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेले राज्यातील 38 हजार विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. त्यांची दरवर्षी जुलैमध्ये परीक्षा घेतली जाते. मात्र, कोरोनामुळे यंदा परीक्षाच झाली नसल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एक वर्षे वाया जाणार आहे. त्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, "अंतिम' परीक्षेच्या धर्तीवर दहावी- बरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे.
from News Story Feeds https://ift.tt/3lkHIaH
via IFTTT


No comments:
Post a Comment