महावितरणची कोंडी; वीज ग्राहकांनी दिला 'असा' शॉक - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

महावितरणची कोंडी; वीज ग्राहकांनी दिला 'असा' शॉक

https://ift.tt/34XYo1k
कोल्हापूर: जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ केली जाणार नाहीत, तोपर्यंत बिले भरू नयेत असे आवाहन कृती समितीने केल्याने गेल्या तीन चार महिन्यात कोल्हापूरकरांनी विजबिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. बिलच न भरण्याचा शॉक ग्राहकांनी दिल्याने सात लाखावर ग्राहकांकडे तब्बल ८३४ कोटी रूपयांची थकबाकी अडकली आहे. यामुळे प्रथमच महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ३३२ कोटी ९४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत ७ लाख ३४ हजार घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. करोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील २ लाख ३८ हजार वीजग्राहकांकडे ५०१ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून करोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेली. तेथूनच महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरवात झाली आहे. वाचा: मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत ४ लाख ८७ हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल २२४ कोटी ३८ लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे २५७ कोटी ७८ लाख तसेच कृषिपंप व इतर एक लाख ४८ हजार ७०० ग्राहकांकडे ५७६ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. लॉकडाऊनच्या काळातील बिले महावितरणने सरासरीप्रमाणे दिली. पण ही बिले भरमसाठ आल्याने ग्राहकांत नाराजी पसरली. ही बिले कमी करावीत, सुधारित बिले द्यावीत, लॉकडाऊन काळातील बिले माफ करावीत अशा मागण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू झाले. ज्येष्ट नेते प्रा.एन. डी.पाटील,प्रताप होगाडे यांनी कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे ग्राहकांनी बिल भरणे थांबवले. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील बिल माफ केले जात नाही, तोपर्यंत बिल भरू नका असे आवाहन कृती समितीने केले आहे. यामुळे बिलच भरण्याची प्रक्रिया थांबल्याने थकबाकी वाढत आहे. वाचा: ग्राहकांना ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे. महावितरणच्या सर्व विभाग कार्यालय अंतर्गत बिलांबाबत हजारो तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व ग्राहकांचे बिलांबाबत शंकानिरसन करण्यात आले. तरीही वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये मोठी वाढ होत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘अनलॉक’मुळे वाणिज्य वापर, रब्बी हंगाम व सणासुदीचे दिवस, औद्योगिक उत्पादन आदींमुळे या महिन्यापासून प्रामुख्याने औद्योगिक, वाणिज्यिक व कृषिपंपांच्या वीजमागणी मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2GTpFdo
via IFTTT

No comments:

Post a Comment