मुंबईः उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि हाथसरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. सर्वसामान्य जनता व विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकारला याच मुद्द्यावरून शिवसेनेनं घेरलं आहे. हाथरससारख्या घटनांमुळं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा ठाकला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पालघरमध्ये घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेनं फटकारलं आहे. शिवसेनेनचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केली तेव्हा संपूर्ण भाजप हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. 'उत्तर प्रदेशात रामराज्यवगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जंगलराज आहे. महिलांवर आत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार व खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहे.' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपड्यांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जागातील सर्वोच्च सुरक्षा आहे. योगी यांनांही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली होती. तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 'बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांना सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिका आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रुढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या. पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहे. योगी राज्यातील तमाम विरोधी पक्ष संस्कृती व कायद्याचे हे वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्स आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता,' असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jpz4qU
via IFTTT


No comments:
Post a Comment