नवी मुंबई: लॉकडाऊन असतानाही परप्रांतीय मजुरांना चिथावणी देऊन वांद्रे इथं गर्दी जमवल्याचा आरोप असलेला उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. विनय दुबे याला ऐरोली येथून ताब्यात घेतले व नवघर पोलिसांकडं सुपूर्द करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ -१ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समजतं. करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. या घोषणेमुळं रोजगाराशिवाय मुंबईत अडकून पडलेल्या व गावाला जाऊ न शकलेल्या मजुरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर अचानक वांद्रे रेल्वे स्थानकाच्या जवळ हजारो मजूर जमा झाले. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून जमाव पांगवला. मात्र, या घटनेचे राजकीय पडसाद उमटले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून चिंता व्यक्त केली व काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तर, सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. या संपूर्ण घटनेसाठी विनय दुबे हा कारणीभूत होता. विनय दुबे हा स्वयंघोषित कामगार नेता असून उत्तर भारतीय व बंगाली मजुरांशी त्याचा चांगला संपर्क असल्याचं बोललं जातं. दुबे यानं 'चलो घर की ओर' अशी ऑनलाइन मोहीमच सुरू केली होती. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून त्यानं उत्तर भारतीय व बंगाली मजुरांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडं गावी जाण्याची सोय करण्याची मागणी करा, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं होतं. फेसबुकवरील त्याची ती पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दुबे हा कल्याणमधून अपक्ष उभा होता. मात्र, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्याकडून त्याचा पराभव झाला होता. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wJSOTc
via IFTTT


No comments:
Post a Comment