नागपूर : नापिकी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातच कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकारने संचारबंदीसोबत लॉकडाउन केल्याने खरेदी केंद्र बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल घरातच पडून आहे. परिणामी पीक कर्ज फेडणे अशक्य होणार आहे. त्यामुळे नव्याने कर्ज मिळण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी अधिक संकटात सापडणार आहे.
कोरोना विषाणूने अख्खे जग विळख्यात घेतले. लाखो लोकांना याची लागण झाली असून, हजारोंचा मृत्यू झाला. भारतासह महाराष्ट्रालाही याची झळ बसली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सराकरने लॉकडाउन घोषित केले असून, संचारबंदीही लागू केली. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे सर्व खरेदी केंद्र बंद करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांकडील कापूस, सोयाबीन, तूर, गहू घरीच पडून आहे. मालाची विक्री झाली नसल्याने हातात पैसा नाही. लॉकडाउन एप्रिलपर्यंत असून त्यानंतरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाउन उठल्यावरच शेतकऱ्यांना मालाची विक्री करता येईल.
- लॉकडाउनच्या काळात शहरातील विद्यार्थ्यांसोबत होतोय भेदभाव!, वाचा सविस्तर...
नवीन कर्ज मिळण्याचा प्रश्न
मालाची विक्री झाल्यानंतरही पैसा लगेच मिळेल, याची शाश्वती नाही. शेतपिकांचे कर्ज फेडण्याची अंतिम मुदत 31 मार्च होती. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना बॅंकेत जाता आले नाही. काही बॅंकांनी कर्ज फेडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. परंतु, व्याज आकारण्यात येणार आहे. मालही घरीच पडून असल्याने पैसा नाही. शेतीचा हंगाम सुरू होणार आहे. काहींनी मशागती सुरू केल्या. खरीप पिकांसाठी कर्ज घेण्यासाठी लगभग सुरू होईल. परंतु, जुने कर्जच फेडता आले नसल्याने नव्याने कर्ज मिळणार कसे, हा मोठा प्रश्न आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगामात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक संकटात सापडले. कोरोनामुळे हे संकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2XtKrG7
via IFTTT


No comments:
Post a Comment