लॉकडाऊनने वाट लावली! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावात - Maharashtra Mazaa

Latest

Friday, August 28, 2020

लॉकडाऊनने वाट लावली! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावात

https://ift.tt/2QwkOzT
मुंबई : देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झाल्याची आकडेवारी अनेकदा समोर आली. पण या काळात नागरिकांवर प्रचंड प्रमाणात मानसिक तणावही आल्याचं सर्वेक्षणात समोर आलंय. एप्रिल ते जून या काळात ८३९६ भारतीयांवर अभ्यास करण्यात आला. या सर्वात मुंबई हे सर्वात प्रभावित शहर असल्याचं समोर आलंय. मुंबईत तब्बल ४८ टक्के तणाव वाढला आहे. उर्वरित देशाच्या तुलनेत हा आकडा प्रचंड मोठा आहे. कारण, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई या शहरातील प्रमाण अनुक्रमे ३७, ३५ आणि २३ टक्के वाढलं आहे. 'भारतातील कोविड आणि लॉकडाऊनमधील ' या अभ्यासात हे सर्व समोर आलं आहे. युअर दोस्त या ऑनलाइन मेंटल हेल्थ प्लॅटफॉर्मकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं. लॉकडाऊनने देशातील मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला असून ६५ टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तणाव आहे. लोकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे हे संकट अजून किती दिवस राहिल. या अभ्यासानुसार, सर्वेक्षणात सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी ४१ टक्के जणांची चिंता वाढली आहे, तर लॉकडाऊनमुळे ३८ टक्के लोकांचा राग आणि चिडचिड वाढली आहे. आनंदी राहण्यात ६ टक्क्यांची घसरण झाल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. काम आणि खाजगी आयुष्य यात संतुलन साधण्यात यश येत नसल्यामुळे ५९ टक्के भारतीय प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच ३३ टक्के लोक प्रचंड तणावात होते. हा आकडा जून अखेरपर्यंत ५५.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला. हे किती दिवस चालणार हा सर्वात मोठा चिंतेचा मुद्दा होता. दीर्घकाळ चाललेल्या या लॉकडाऊनमुळे काम आणि आयुष्य यात संतुलन साधण्यातही अडचण आली. पाचपैकी दोन भारतीय कर्मचारी वेतन कपातीचा सामना करत आहेत. टीम मॅनेजरही सध्या प्रचंड तणावात आहेत. कारण, एवढ्या मोठ्या टीम घरात बसून मॅनेज करण्याचं कौशल्य अनेकांमध्ये नाही. शिवाय कोण कसं काम करतं याचं मूल्यमापन करण्याचं साधनही टीम मॅनेजर्सकडे नाही, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ञ डॉ. जिनी के गोपीनाथ यांनी दिली. तणावग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक (३९ टक्के) आहे. तर यानंतर नोकरदार (३५ टक्के) आहेत. लॉकडाऊनमध्ये जशी वाढ होत गेली तसं विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या जास्त त्रास झाला. राग, चिंता आणि चिडचिड यामध्ये जास्त वाढ झाली. लॉकडाऊनमुळे इमोशनल होण्याचं प्रमाण २२ टक्क्यांनी वाढलं, तर झोप ११ टक्क्यांनी कमी झाली. अनेकांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मित्र आणि कुटुंबाशी फोनवर बोलणे, बातम्या वाचणं कमी करणे असे विविध मार्ग अवलंबले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YH5vst
via IFTTT

No comments:

Post a Comment